あらすじ
अमेरिकेहून परत आल्यावर स्वामी विवेकानंदांनी कोलंबो ते अल्मोर्यापर्यंत अनेक शहरांमध्ये विभिन्न विषयांवर व्याख्याने दिली. मद्रास येथे 'The Future of India' या विषयावर त्यांनी इंग्रजीत जे व्याख्यान दिले त्याचाच प्रस्तुत पुस्तक हा मराठी अनुवाद आहे. स्वामी विवेकानंदांचे भारतावर अपार प्रेम होते आणि या प्रेमामुळेच भारताचे भवितव्य उज्ज्वल व्हावे आणि भारताला जगात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे असे त्यांना हृदयाच्या अगदी अंतस्तलापासून वाटे. त्यांच्या मते धर्म हा भारताचा प्राण असून धर्मामधील शाश्वत सत्यांच्या आधारावर भारतामध्ये पुनरुत्थान घडवून आणले पाहिजे. तसेच, भारताचा भावी काळ उज्ज्वल होण्यासाठी ऐक्य, सर्वसामान्य जनतेमधे शिक्षणाचा प्रसार, त्यागाचा व सेवेचा आदर्श, ‘खरा माणूस’ बनविण्याची महत्त्वाकांक्षा इत्यादी गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांनी या सर्व गोष्टींचे विवरण केले असून ओजस्वी व स्फूर्तिदायक शब्दांनी त्यांचे महत्त्व पटवून दिले आहे. जीवनाच्या विभिन्न क्षेत्रांत प्रगती व्हावी म्हणून भारतात आज अनेक प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. ही प्रगती साधण्यासाठी आणि भारताचे मस्तक उन्नत होण्यासाठी प्रस्तुत पुस्तकातील स्वामी विवेकानंदांचे शक्तिदायी विचार सगळ्यांनाच खचित मार्गदर्शक होतील.