あらすじ
चित्रकार-शिल्पकारांनी कुणाच्याही आश्रयाला किंवा कुणाच्या ‘पदरी' न राहाता स्वतःच्या हिमतीवर कार्यरत राहणे, हे आधुनिक कलेचे पायाभूत वैशिष्ट्य. कलावंताच्या प्रतिभेचा संबंध अवघ्या जगाशीच असतो, तो कुणा एका देशाशी, विशिष्टच निष्ठा वा धारणांशी नसतो, ही अभिजात कलाव्यवहाराची निजखूण. या पटावर शिल्पकार भाऊ (सदाशिव) साठे यांचा आधुनिकपणा आणि त्यांच्या कलाजाणिवांना असलेली अभिजाततेची आस वाचकांपर्यंत पोहोचणे हे या पुस्तकाचे सार्थक! कल्याणचा वाडा सोडून १९५०च्या दशकारंभी भाऊ साठे दिल्लीत आले आणि दोन दशकांत त्यांच्या शिल्पांचा अवकाश लंडनपर्यंत पोहोचला तो कसा, याची प्रांजळ कहाणी या आत्मकथनात येते. कौटुंबिक, स्थानीय, व्यावसायिक आणि राजकीय नातेसंबंधांची समृद्धी त्यात आहे; पण त्या साऱ्यातूनही व्यक्तित्वांच्या पलीकडले भान साठे सतत जपतात. सहलेखनामुळे हे आत्मकथन अनेकपदरी झाले आहे. सतीश कान्हेरे यांनी काही ठिकाणी तर, साठे यांचे म्हणणे कुठे संपते आणि स्वतःचे कुठे सुरू होते हे वाचकाला कळू नये, अशा खुबीने लिखाणाची जबाबदारी हाताळली आहे. या कथनाला कधी पत्रांची तर कधी नोंदींची जोड आहे, कधी कालानुक्रमाला फाटा देऊन खुद्द साठे यांनी व्यक्त केलेली निरीक्षणे आहेत... वर्ज्यस्वर नसणारा जीवनराग आळवणारी ही मैफल, आपल्याला कलाजाणिवांपर्यंत नेणार की त्या वातावरणाने आपण दिपणार, ही कसोटी मात्र प्रत्येक वाचकाने स्वतःची स्वतः घ्यायची आहे! अभिजित ताम्हाणे, कला समीक्षक